यूपीएससीमध्ये परीक्षा उतीर्ण होण्यासाठी ‘भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ’ या घटकाचा परीक्षाभिमुख आवाका लक्षात घेऊन याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ या घटकाचे परीक्षभिमुख आकलन करताना साधारणत: खालील पद्धतीने विभागणी केली जाऊ शकते.
प्राचीन भारत – यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्व आणि अभ्यासाची साधने, प्रागैतिहासिक भारत, ताम्रापाषण कृषी संस्कृती, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजन पदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मोर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड इत्यादी.
मध्ययुगीन भारत – यामध्ये प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड (इ.स. ७५०-१२००), दिल्ली सल्तनत, उत्तर भारतातील प्रादेशिक देशी सत्ता, विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे, मुघल साम्राज्य, मराठा कालखंड आणि मध्ययुगीन भारतातील धार्मिक चळवळी इत्यादी.
आधुनिक भारत – यामध्ये युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील उठाव, १९ व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृत्तपत्रे यांची वाढ आणि विकास, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळी, कामगार चळवळ, भारतातील सांप्रदायिकतेची वाढ, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय, भारतातील घटनात्मक विकास, महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी.
भारतीय कला आणि संस्कृती – यामध्ये भारतीय स्थापत्य कला आणि शिल्पकला, भारतीय चित्रकला, भारतीय संगीत, नृत्य आणि नाटय़, भारतीय साहित्य, भारतीय हस्तकला इत्यादी अशी विभागणी करावी लागते.
यातील आधुनिक भारत आणि भारतीय कला आणि संस्कृती हा भाग मुख्य परीक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे, त्यामुळे याचा अधिक सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.